मुंबईतील गरीब आणि गरजू रुग्णांचा सर्वात मोठा आधार म्हणजे सरकारी रुग्णालय. मुंबई शहर, उपनगरच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो रुग्ण इथं येतात. तासन् तास रांगेत उभं राहून, असंख्य हालापेष्टा सहन करून उपचार घेतात. त्यातील काही रुग्ण रुग्णालयाच्या गलथानपणाचा बळीही पडतात. पण रुग्णालय प्रशासन, इथले कर्मचारी आणि डाॅक्टरांकडून या रुग्णांची नेहमीच उपेक्षा केली जाते, असाच एक प्रकार कुर्ल्यात राहणाऱ्या महिलेच्या बाबतीत घडला आहे. या महिलेने सायन रुग्णालयात गर्भाशयाची शस्त्रक्रिया करूनही तिला अनपेक्षितरित्या बाळ झालं. याबाबत तिने दाद मागूनही सायन रुग्णालयाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. एवढंच नाही, तर ३ महिन्यांपूर्वी सायन पोलिस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही. अखेर उशीरा का होईना जाग येत पोलिसांनी याप्रकरणी जबाब नाेंदवण्यास सुरूवात केली आहे.
कुर्ल्यातील सुंदर बाग परिसरात राहणारे यशवंत कदम यांच्या पत्नी दीपा कदम तिसऱ्यांदा गरोदर राहिल्या. तिसरं अपत्य नको असल्याने या दाम्पत्याने गर्भपात करून नंतर गर्भाशयाचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. गर्भपातासाठी दीपा १२ जून २०१७ सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आल्या. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आम्हाला २ महिन्याच्या अर्भकाचा गर्भपात करायचा आहे, असं त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. एन. एन. चव्हाण यांना सांगितलं. त्यानुसार रुग्णालयाने गर्भपाताची परवानगी दिल्यानंतर डाॅक्टरांनी दीपाच्या गर्भाशयाच्या आॅपरेशनची तयारी केली.
गर्भपाताच्या शस्त्रक्रियेनंतर दीपाला शारीरिक त्रास होऊ लागला. त्यामुळे दीपा पुन्हा सायन रुग्णालयात डॉक्टरांकडे आपल्या समस्या दाखवण्यासाठी गेल्या असता डॉक्टरांनी त्यांना "ऑपरेशननंतर अशा प्रकारचे त्रास होतातच " असं म्हणत उडवा उडवीची उत्तरं दिली. ऑपरेशनच्या ३ महिन्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये दीपाच्या शरीरात काहीसे बदल दिसून आले. हे बदल त्यांना विचित्र वाटल्यानंतर त्यांनी थेट सायन रुग्णालय गाठलं आणि तपासणी करून घेतली.
या तपासणीत दीपा गर्भपाताच्या आॅपरेशननंतरही ५ महिन्यांची गर्भवती असल्याचं त्यांना समजलं. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर डॉक्टरांनी आपली चूक मान्य केली.
त्यानंतर दीपा ८ महिन्यांची गर्भवती असताना सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाच्या मेंदूत रक्तपुरवठा होत नाही आणि त्याच्या यकृतावर सूज आहे, असं म्हणत त्यांना मुदतपूर्व प्रसूती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे दाम्पत्य रुग्णालयात दाखल झाल्यावर दीपाची नैसर्गिक प्रसूती करण्याऐवजी सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. दीपाने १६ डिसेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर बाळाची तपासणी केल्यानंतर बाळ पूर्णतः बरं आहे, असं समजल्यावर मात्र डाॅक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांचा संताप अनावर झाला.
आमची परिस्थिती गरीब आहे. आमच्या मासिक उत्पन्नातही आमचं घर चालवणं शक्य होत नाही. अशात आम्ही तिसऱ्या बाळाचा विचार करणं योग्य नव्हतं म्हणून आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतला; पण केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे.
- दीपा कदम, रुग्ण
गर्भपातानंतर महिलेला मासिक पाळी आली नाही, तर त्या महिलेला परत तपासणीकरीता येण्याचा आम्ही सल्ला देतो, दीपाच्या बाबतीतही आम्ही तेच केलं. पण २० आठवड्यानंतर दीपा तपासणीसाठी आली तेव्हा गर्भपात यशस्वी झाला नाही हे आमच्या निदर्शनास आलं. सध्या हा खटला मानवी हक्क विभागाकडे असून ते जे निर्णय घेतील ते आम्ही मान्य करू.
- जयश्री मोंदकर, अधिष्ठाता, सायन रुग्णालय
आपल्यावर जो अन्याय झाला, तशी वेळ इतर कुणावरही येऊ नये म्हणून कदम दाम्पत्याने फेब्रुवारी महिन्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. एन. एन. चव्हाण आणि डाॅ. मोना यांच्याविरोधात सायन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पण पोलिसांनीही त्यांच्या तक्रारीकडे सुरूवातीला दुर्लक्ष केलं. अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी डाॅक्टरांचा जबाब घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांच्या चौकशीतून दोषी डाॅक्टरवर कारवाई होऊन आपल्याला न्याय मिळेल, अशी कदम दाम्पत्याला आशा आहे.
हेही वाचा-
सेवन हिल्सच्या जागी कँसर रुग्णालय सुरू करा - रवींद्र वायकर
आजोबांनी गिळला दात, आॅपरेशनने वाचला जीव