मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणे, शौचालयांची संख्या वाढविणे, फूड हब तयार करणे, बस थांब्यांचे नूतनीकरण ही कामे जून अखेपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. वर्षां येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी, पी. वेलारासू आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईत स्ट्रीट फूड हब करण्यात येत असून त्यासाठी ६२ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातील शौचकुपांची संख्या वाढविण्यात येणार असून नव्याने २२ हजार ७७४ शौचकुप बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी २० हजार ३०१ शौचकुपांचे काम जून अखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८६३७ नविन प्रसाधन गृह बांधण्यात येणार आहेत.
महानगरातील ३८६ ठिकाणी पावसाचे पाणी साचून पुरस्थिती निर्माण होते. त्यातील १७१ ठिकाणांचे काम पूर्ण झाले असून १२० ठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे एकूण २९१ ठिकाणची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. मुंबई शहरात पुरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. महानगरातील मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.