मुंबईचा विकास करत असताना मुंबईच्या प्रकल्पांसाठी एक स्वतंत्र धोरण ठरवण्यात आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 प्रकल्पांचं मॉनिटरींग करण्यासाठी 'वॉर रूम' सुरु केली आहे. यामध्ये 21 प्रकल्पांचं सूक्ष्म मॉनिटरींग आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठीची कार्यवाही केली जाते. आगामी काळात या 21 प्रकल्पांचं लाइव्ह मॉनिटरींग करण्याबरोबरच हे सगळे प्रकल्प डॅशबोर्डवरही घेतले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी धवसे यांनी ‘मुंबई - द फायनान्शिअल हब : द वे अहेड’ या विषयावर आयोजित परिसंवादात दिली.
मुंबई देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. नव्याने सुरु होत असलेले वेगवेगळे प्रकल्प, निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा मुंबईच्या गतिमान विकासासाठी महत्वाच्या आहेत. मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून तो पुढील दशकांसाठी दिशादर्शक असेल, असे मत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले. मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स 2018 अंतर्गत ते बोलत होते.
नवीन विकास आराखड्यामध्ये मुंबईतल्या प्रत्येक बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. आगामी काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर असणार आहे. आज मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान सुरु करण्यात आलेली मेट्रो रेल्वे, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या मेट्रो रेल्वेमुळे पूर्वी प्रवासासाठी दीड तास लागणारा वेळ 15 मिनिटांवर आला आहे. आगामी काळात सर्वसामान्यांना परवडणारी घरं उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासन लक्ष केंद्रित करीत असल्याचेही श्रीनिवासन यांनी सांगितले.
हेही वाचा
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'तून ३५ लाख रोजगार: सुभाष देसाई