Advertisement

मेट्रो-२ बी विरोध: संतापलेले स्थानिक करणार 'नोटा'चा वापर

मेट्रो २ बी संबंधात ज्या काही आपल्या मागण्या आहेत, त्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. मात्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं सरकारविरोधातही स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीपर्यंत मेट्रो-२ बी संदर्भातील मागणी मान्य न झाल्यास सरकारला निवडणुकांमध्ये धडा शिकवू असा इशारा काही स्थानिकांनी दिला आहे.

मेट्रो-२ बी विरोध: संतापलेले स्थानिक करणार 'नोटा'चा वापर
SHARES

मेट्रो-२ बी अर्थात डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रो मार्गाला जेव्हीपीडी, खार आणि वांद्रयातील स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. एक तर मार्ग रद्द करा किंवा उन्नत मेट्रो मार्गाएेवजी भुयारी मेट्रो मार्ग करा अशी स्थानिकांची मागणी आहे. मात्र ही मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून फेटाळून लावण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक आक्रमक झाले असून स्थानिकांनी मेट्रो-२ बी विरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ सप्टेंबरला स्थानिक रस्त्यावर उतरणार आहेत. तर दुसरीकडे येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत नोटाचा वापर करण्याचा निर्णयही काही स्थानिकांनी घेतल्याची माहिती नितीन किलावाला यांनी दिली.


कुणाला होणार त्रास?

जेव्हीपीडी ते वांद्रे दरम्यान ज्या भागातून मेट्रो-२ बी जाणार आहे, त्या भागातील रस्ते अत्यंत छोटे असल्यानं इथं आधीच वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. असं असताना मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी काय रूप घेईल, हे सांगता येणार नाही, असं म्हणत जेव्हीपीडी, खार आणि वांद्रे येथील रहिवाशांनी या मार्गाला विरोध केला आहे.



उच्च न्यायालयात धाव

पण, मार्ग रद्द करणं वा भुयारी मेट्रो मार्ग करणं दोन्हीही शक्य नसल्याचं म्हणत एमएमआरडीएनं स्थानिकांचा विरोध डावलून मेट्रो २ बीचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे नाराज झालेल्या स्थानिकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.


मोर्चाची हाक

स्थानिकांकडून एकीकडं न्यायालयीन लढाई तर दुसरीकडं रस्त्यावरची लढाई सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी स्थानिकांनी जेव्हीपीडी इथल्या जमनाभाई स्कूल सभागृहात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत ११ सप्टेंबरला मोर्चाची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार ११ सप्टेंबरला सकाळी खार इथून मोर्चा निघेल आणि तो एमएमआरडीएवर धडकेल असंही किलावाला यांनी सांगितलं.



सरकारविरोधात नाराजी

दरम्यान मेट्रो २ बी संबंधात ज्या काही आपल्या मागण्या आहेत, त्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. मात्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं सरकारविरोधातही स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीपर्यंत मेट्रो-२ बी संदर्भातील मागणी मान्य न झाल्यास सरकारला निवडणुकांमध्ये धडा शिकवू असा इशारा काही स्थानिकांनी दिला आहे.

त्यानुसार येत्या निवडणुकीत नोटाचा वापर करू असंही स्थानिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता हा प्रश्न चिघळणार असल्याचं म्हटलं जात असून सरकार आणि एमएमआरडीए काय भूमिका घेते, न्यायालयाचा निर्णय काय येतो यावरही बरंच काही अवलंबून आहे.



हेही वाचा-

५३ मेट्रो स्थानकं होणार हरित

मेट्रो मार्गिका ठरवताना स्थानिकांशी चर्चा का नाही? न्यायालयाचा 'एमएमआरडीए'ला सवाल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा