डी. एन. नगर ते मंडाले (मानखुर्द) मेट्रो २ ब चा मार्ग बदलण्यात यावा किंवा हा मार्ग पूर्णतः भुयारी करावा, या मागणीसाठी जुहू, खार, सांताक्रूझ आणि वांद्रे येथील रहिवासी आक्रमक झाले आहेत. रहिवाशांच्या मागणीकडे राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कानाडोळा करत असल्याने रहिवाशांनी रस्त्यावरचं आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबरला दुपारी ३ किमीची मानवी साखळी तयार करत 'एमएमआरडीए' आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम तज्ज्ञ आणि येथील रहिवासी नितीन किलावला यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
मेट्रो २ ब प्रकल्प जुहू ते वांद्रे दरम्यान ज्या रस्त्यावरून नेण्यात येणार आहे, ते रस्ते छोटे आणि प्रचंड वाहतुकीचे आहेत. असं असताना याच रस्त्यावर मेट्रोचे खांब येत असल्याने रस्ते आणखी अरुंद होणार आहेत. यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर होणार असल्याचं म्हणत जुहू ते वांद्रे दरम्यान राहणाऱ्या रहिवाशांनी मेट्रो २ ब मार्गाला जोरदार विरोध केला आहे.
एक तर मार्ग बदला किंवा मेट्रो २ ब भुयारी करा, अशी त्यांची मागणी आहे. पण 'एमएमआरडीए' मात्र उन्नत मेट्रो मार्गावर आणि याच आराखड्यावर ठाम आहे. 'एमएमआरडीए'ने रहिवाशांची मागणी फेटाळल्याने रहिवाशांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
असं असलं तरी रस्त्यावरची लढाई ही रहिवाशांनी सुरूच ठेवली आहे. आगामी निवडणुकीपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मतदानावर बहिष्कार घालण्याचाही इशारा रहिवाशांनी दिला आहे. मेट्रो २ ब ला नेमका का विरोध आहे? याबाबत सर्वसामान्यमध्ये जनजागृती करत आंदोलन आणखी भक्कम करण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी रहिवासी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.
खार येथील सेक्रेट हार्ट शाळेपासून ते वांद्रे, मस्जिदपर्यंत ३ किमीची मानवी साखळी तयार केली जाणार आहे. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी दुपारी १ ते ३ दरम्यान हे मानवी साखळी आंदोलन होईल, असंही किलावला यांनी सांगितलं आहे. हे आंदोलन शांततेत पार पडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा-
मेट्रो-२ बी विरोध: संतापलेले स्थानिक करणार 'नोटा'चा वापर
मेट्रो मार्गिका ठरवताना स्थानिकांशी चर्चा का नाही? न्यायालयाचा 'एमएमआरडीए'ला सवाल