मुंबई – कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 मार्गामुळे गिरगावातील अंदाजे 14 चाळीतील रहिवाशी विस्थापित होणार आहेत. एप्रिल-मे महिन्यात रहिवाशांना संक्रमण शिबिरात किंवा भाड्यानं स्थलांतरीत करण्यात येईल. त्यानंतर इमारती पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या इमारतींच्या जमिनीपैकी आवश्यक ती जमीन मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येईल. तर उर्वरित जागेवर 20 मजल्यांच्या सहा इमारती बांधण्यात येणार आहेत.
विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी मुंबई मेट्रोरेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)नं सविस्तर आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला नुकताच सरकारनं हिरवा कंदिल दाखवला आहे. या आराखड्यानुसार चाळीत राहणारे थेट 20 मजली टॉवरमध्ये राहायला जाणार आहेत. तसंच चाळकऱ्यांना किमान 400 चौरस फुटाचे घर मिळणार आहे.
तीन वर्षात काम पूर्ण करून रहिवाशांना हक्काची घरे देण्याचा मानस एमएमआरसीचा असल्याचंही एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. तसंच हा आराखडा मान्य असून विस्थापनाला गिरगावकरांचा विरोध नसल्याचा दावा एमएमआरसीनं केला आहे. तर गिरगावकर या आराखड्यामुळे खुश आहेत, असं 'आम्ही गिरगावकर' संस्थेनं स्पष्ट केलं.