नव्या वर्षात नवे संकल्प आलेच! प्रत्येक वर्षी आपण सर्वच कोणता ना कोणता संकल्प करतो. पण, 'नव्याचे नऊ दिवस' या म्हणीनुसार जसजसे दिवस पुढे जातात तसतसा उत्साह कमी होत जातो. म्हणूनच गेल्या काही काळात केलेले महत्त्वाचे संकल्प पूर्ण करण्याचाच संकल्प यंदा करा! कुणी यावर्षी स्लिम होण्याचा, तर कुणाचा हेल्दी फूड खाण्याचा किंवा कुणी दुसरा काही तरी संकल्प केला असेल.
प्रत्येकाचे काही ना काही संकल्प असतीलच. पण वर्षाच्या सुरुवातीला केलेला संकल्प काटेकोरपणे पाळला जाईल की नाही, याची काही खात्री नसते. पण यावर्षी संकल्प पाळण्याचाच संकल्प करा. वर्षाच्या सुरुवातीलाच कशाला, तुम्हाल जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही संकल्प करू शकता. संकल्प करण्यासाठी वेळेची कोणतीही बंधनं नाहीत. आणि तुम्हाला हे संकल्प करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. आम्ही तुम्हाला अशा काही काही टिप्स देणार आहोत, ज्यांची अंमलबजावणी केली, तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल!
भूक लागल्यावर म्हणा किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणा, आपण अरबट-चरबट खातोच. पण वेफर्स, बर्गर अशा पदार्थांच्या सेवनानं आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. त्यामुळे भूक लागली असेल किंवा काही खाण्याची इच्छा होत असेल, तर हेल्दी खाणं आवश्यक आहे. अरबट-चरबट खाण्यापेक्षा एक बाऊल मखाना (लोटस सीड्स) किंवा कॉर्न खाऊ शकता. शिवाय तुम्ही बदाम, काजू, मनूका असे ड्रायफ्रूट्स किंवा सलाडदेखील खाऊ शकता.
सर्वांनाच जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य होतं नाही. ज्यांनी जिम लावलं असेल ते देखील जिममध्ये नियमीत जात नाहीत. पण घरातल्या घरात छोटे छोटे व्यायाम आपण करू शकतो. जसं की, घरातून बाहेर पडताना किंवा परत येताना बिल्डींगची लिफ्ट वापरू नका. त्याऐवजी जिन्यांचा वापर करा. चालण्याची सवय लावा म्हणजे फॅट वाढणार नाही. रोज ५ किलोमीटर चालायचं किंवा १൦൦ जिने चढउतार करायचे, असं टार्गेट ठेवा.
सात ते आठ ग्लास पाणी म्हणजेच दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. त्यामुळे आपचन आणि पोटाचे विकार होत नाहीत. शिवाय सकाळी उठल्यावर लिंबाचा रस आणि कोमट पाण्याचे सेवन करा. यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल. तसंच वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि कोमट पाण्याचे सेवन करा.
रात्रीचं जागरण टाळा. टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाईलचा वापर रात्री उशीरापर्यंत करू नका. सहा ते सात तास झोप शरीराला आवश्यक असते. त्यामुळे रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठा. तुमची झोप पूर्ण झाली असेल तर तुम्हाला फ्रेश वाटेल.
आरोग्याला आवश्यक असलेल्या तपासण्या दर ५ ते ६ महिन्यांनी करणं आवश्यक आहे. यामुळे जर कोणती शारीरिक किंवा मानसिक समस्या असेल, तर वेळेत उपचार करता येतील.
हेही वाचा