मुंबई - कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह साजरा करण्याची पद्धत आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीच्या दिवशी तुळशीचा भगवान विष्णूंशी विवाह झाला असे मानले जाते. ही परंपरा आजही अनुसरली जाते. तुळशीचं रोप आणि श्रीकृष्णाची मूर्ती यांचा विवाह लावला जातो. यानंतरच्या काळात प्रत्यक्षात वधु-वरांची लग्ने योजण्यास सुरुवात केली जाते.
अनेक ठिकाणी अजूनही कार्तिक स्नान केले जाते. म्हणजे पहाटे थंड पाण्यानं आंघोळ करून, पहाटे देवळात आरतीला जातात.
तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी विवाह करविला जातो.