ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या नाराज आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. नाराज आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर आहे. सगळे नाराज आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या आमदारांनी अजून उद्धव ठाकरेंची वेळ घेतलेली नाही. पण लवकरच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील.
रामदास कदम, दिवाकर रावते, भास्कर जाधव, दीपक केसरकर, रविंद्र वायकर, तानाजी सावंत सुनील प्रभू, सुनील राऊत, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, आशीष जैस्वाल, संजय रायमुलकर, संजय शिरसाट, अनिल बाबर अशी या आमदारांची नावं आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात विशेषत: शिवसेनेतील अनेक प्रस्थापितांना धक्का देण्यात आला आहे. मंत्रिपदाचा अनुभव असलेले दिवाकर रावते, रामदास कदम, भास्कर जाधव, रविंद्र वायकर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांसारख्या चेहऱ्यांना विश्रांती देत उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. हे करतानाच अनेक इच्छूकांचाही ऐनवेळी पत्ता कापण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद वाढली असून ती अनेक प्रकारे बाहेर येऊ लागली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शरद पवारांनी हस्तक्षेप केल्यानं डावललं गेलं अशी भावना अनेक शिवसेना आमदारांमध्ये असल्याची चर्चा आहे. याशिवाय मंत्रिमंडळातील सगळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेल्यानं आमदारांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जातंय.
हेही वाचा