लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना - भाजपा युती आणि इतर पक्षांनी अद्याप आपली उमेदवार यादी जाहीर केली नसली तरी कोठून कोण लढणार याचे अंदाज वर्तवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एमआयएमचे एकमेव आमदार वारिस पठाण हे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा भारीप आणि असदुद्दीन ओवेसींचा एमआयएम पक्ष युती करून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. एमआयएमचे आमदार वारिस पठाण हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून एमआयएम आपला उमेदवार उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. एमआयएमने या मतदारसंघातून उमेदवार दिल्यास काँग्रेससाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी याआधीच राज्यातील २२ जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. एमआयएमनेही याला पाठिंबा दिला आहे. भारिपला बरोबर घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. महाआघाडीत भारिप सहभागी न झाल्यास काँग्रेसला मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमआयएमचे मुंबई आणि औरंगाबाद येथील आमदार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे महाआघाडीत जागा वाटपाचा मुद्दा ५ दिवसात न सोडवल्यास राज्यातील सर्व ४८ जागा लढवू, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा -
कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर फुटणार युतीच्या प्रचाराचा नारळ
'अशी' असेल राज्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया