प्रत्येक वेळेला घटना घडली की जाग येते ही सरकार, प्रशासन आणि सर्वसामान्यांना जडलेली सवयच आहे. वांद्र्यातील गरीब नगरला लागलेली आग कच्ची बांधकाम पक्की करण्यासाठीच लागल्याचा संशय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका करताना राज म्हणाले की, वांद्र्यातील झोपडपट्टी बघितली की धारावीची झोपडपट्टी कमी वाटू लागते. इथं राहणारे बहुतांश बांगलादेशी, पाकिस्तानी मुसलामान आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीच काय, तर सत्ताधाऱ्यांचंही याकडे लक्ष नाही. फक्त मतांसाठी हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला हे असले 'मोहल्ले' वाढवायचे असं काम या सरकारच्या काळातही जोरदारपणे सुरू आहे.
मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांना घरपोच साईसुविधा मिळतात. पण मूळच्या स्थानिकांना सुविधांसाठी वणवण फिरावं लागतं. सगळेजण त्यांच्याकडे थट्टा म्हणून बघतात. हे लोक जेव्हा अंगावर येतील, तेव्हा तुम्हाला मनसेचा सैनिकच आठवेल असंही राज म्हणाले.
सरकार पैसे नसताना योजना जाहीर केल्या. शेतकरी कर्जमाफी म्हणजे मूर्ख बनवण्याचं काम आहे. त्यामुळे 'अच्छे दिन'चा हा फुगा लवकरच फुटणार आहे. सर्व सुरळीत असताना 'जीएसटी'चा घाट का घातला? असा सवाल करत राज यांनी देशाची अर्थव्यवस्था गर्भगळीत झाल्याचं म्हटलं. तसेच गुजरातमध्ये भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर त्यात मशिनचा वाटा सर्वाधिक असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
रेल्वेच्या शेजारी फुटपाथवर जे फेरीवाले बसतात त्या फेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटी रुपयांचे हप्ते मिळतात. त्यामुळेच आम्ही या फेरीवाल्यांना उठवण्याचं काम केलं की आमच्या कार्यकर्त्यांवर केस टाकल्या जातात, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा -