Advertisement

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या

कांजुरमार्ग या मेट्रो कारशेडच्या जागेवरून भाजप व शिवसेना यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले आहेत.

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या
SHARES

कांजुरमार्ग या मेट्रो कारशेडच्या जागेवरून भाजप व शिवसेना यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले आहेत. मेट्रो कारेशेडच्या जागेवरून भाजप व शिवसेना एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. अशातच आता माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमैय्यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. तसंच, केवळ राजहट्ट आणि बालहट्टासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं ही त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी १ वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसंच भाजपाच्या इतर नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर टीका केली.

कांजूरमार्ग इथं प्रकल्प हलविल्यानंतर या प्रकल्पाला ४ वर्षे उशीर होणार हे उद्धव ठाकरेंना माहिती होते, तरीही हा घाट घालण्यात आल्याचं किरीट सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट केलं. कांजूरमार्गची जागा न्यायालयीन वादात आहे. त्यामुळं ठाकरे सरकारच्या समितीनंच दिलेल्या अहवालातून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलविल्यास ४ वर्षांचा विलंब होणार आहे. मात्र, तरीही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ बालहट्ट आणि राजहट्टासाठी हा प्रकल्प कांजूरमार्गला हलविण्याचे आदेश दिले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरे यांना अहंकारी असं संबोधलं होतं. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे फडणवीस यांच्या अहंकारी टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, फडणवीस यांनी पुन्हा एकदा ही श्रेयवादाची लढाई नसून लोकांची दिशाभूल कशाला करता? असा सवाल उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा प्रश्न फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसंच, ३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही.

एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग इथं कारशेड नेल्यास किती मोठं आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग इथं कारशेड करायचं असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावंच लागेल हे का लपवून ठेवता? असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.

या मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. मी स्वत: मेहनत करुन ८० टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलं आहे. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय करणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा