राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांकडून जमीन घेतल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? असा प्रश्न देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर यासंबंधीची कागदपत्रेच ट्विट केली आहेत. यांत संबंधित जमिनीच्या सातबाराचा समावेश आहे.
गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रवींद्र वायकर यांची नावे नऊ ठिकाणी दिसत आहेत.
रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी संयुक्तपणे कोलेई, मुरूड, रायगड येथील जमीन अन्वय नाईक, अक्षता नाईक यांच्याकडून मार्च २०१४ मध्ये २.२० कोटी रुपयांना विकत घेतली होती. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना याच कारणामुळे लक्ष्य करण्यात येत आहे का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा- अखेर अर्णब गोस्वामींंना जामीन मंजूर
Smt Rashmi Uddhav Thackeray & Manisha Ravindra Vaykar jointly bought several pieces of land at Korlai, Murud Raigad from Late Anvay Naik, Smt Akshta Naik..in March 2014 at ₹2.20 Crores. The reason to target #ArnabGoswamy ??
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 11, 2020
@BJP4India @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/nS7rf2H5M1
मी या कागदपत्रांची तपासणी केली असून ही कागदपत्रे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना पाठवली आहेत. ७/१२ ची जमीन नोंद (मुरूड, रायगड), महाराष्ट्र सरकारच्या जमीन नोंदी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात देखील अन्वय नाईक यांच्याकडून कुटुंबाने जमीन खरेदी केल्याचं नमूद केलं आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
या कागदपत्रांमुळे भाजपच्या हाती आयतं कोलीत लागलं असून जमीन खरेदी प्रकरणावरून भाजप नेते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लक्ष्य करू लागले आहेत.
दरम्यान, इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे अर्णब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्णब गोस्वामी यांच्यासोबत इतर दोन आरोपींनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
(bjp leader kirit somaiya alleges on maharashtra cm uddhav thackeray over land purchase from anvay naik family at raigat)