धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.
या संदर्भात मत मांडताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असं वक्तव्य खुद्द सरकारमधील मंत्र्यांनी केलं होतं. या प्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. राज्य शासनाने देखील न्याय देण्याची भूमिका तात्काळ घेण्याची गरज आहे. या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींच्या भविष्यावरील घोर अन्याय आहे.
जोपर्यंत हा घोळ मिटत नाही, तोपर्यंत निवडणुका न घेण्याची भूमिका राज्य शासनाने (maharashtra government) देखील घेण्याची आवश्यकता आहे. आमच्यासमवेत त्यांनी कोर्टात येण्याची आवश्यकता आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
हेही वाचा- ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, देवेंद्र फडणवीस संतापले
धुळे, नंदुरबार सह राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका लागल्याचे समजले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. #obcreservation pic.twitter.com/E9cVqZZGK7
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 22, 2021
न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषद; तसंच त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान; तर २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी केली. पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका तेथील कोविड-१९ ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असंही मदान यांनी स्पष्ट केलं.
मात्र त्याआधी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी मंत्री असलो तरी जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र यानंतर लगेच निवडणुका जाहीर झाल्यामुळे भाजपला टीकेची संधी मिळाली आहे.
ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट सरकारच्या वतीने घातला जातोय, हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. या निवडणुका जर रद्द केल्या नाहीत, पुढं ढकलल्या नाहीत तर भाजप याविरोधात उग्र आंदोलन करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिला आहे.
(bjp leader pankaja munde demands to cancel by election on obc reservation issue in maharashtra)