शिवसेनेनेच्या वतीने दक्षिण मुंबईत अजान पठण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावरून शिवसेनेला भाजपकडून लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेने भगवा तर केव्हाच सोडला, आता केवळ हिरवा खांद्यावर घेणं शिल्लक आहे, असं म्हणत भाजप (bjp) आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली.
या स्पर्धेबद्दल बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, शिवसेनेने (shiv sena) अजानची स्पर्धा ठेवण्याचं जाहीर करणं म्हणजे शिवसेनेने भगवा तर उतरवलेलाच आहे, पण आता हिरवा खांद्यावर घेण्यासारखं आहे. अजान आता शिवसेनेला फार गोड वाटू लागलं आहे. हे म्हणणं म्हणजे ओवैसीलासुद्धा लाज वाटेल इतकी शिवसेनेची लोकं सेक्युलर बनली आहेत. मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचं काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केलं नाही. पण काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आज हेच करतायत. बाळासाहेबांचं हिंदुत्व तर त्यांनी केव्हाच सोडलं होतं. पण आता मतांकरीता अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करण्याचा शिवसेनेचा हा निंदनीय प्रयत्न आहे.
हेही वाचा- चक्क शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन
या पुढे दसरा मेळाव्यानंतर नारा ए तकबीर... अल्ला हू अकबर च्या घोषणा ऐकू येणार बहुतेक… अजानच्या भोंग्यांना विरोध करणाऱ्या मानखुर्दच्या करिष्मा भोसले या तरुणीला पोलिसांनी का त्रास दिला याचं कारण आता उघड झालं. लहान मुलांसाठी अजान स्पर्धेनंतर रस्त्यावर सामूहिक नमाज स्पर्धेचं आयोजनही करा, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला.
मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतायत. ओवेसीला लाज वाटेल असे हे लांगुलचालन आहे. pic.twitter.com/3epEAS2i7k
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2020
शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी भगवदगीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील मुलांसाठी आजान पठण स्पर्धा आयोजित केली आहे. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व असून प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यामुळे अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात एका आॅनलाईन मुलाखतीत पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं की, अजान एका धर्माची भावना आहे. अजान ऐकून मुस्लिम बांधव आपल्या दिवसाची, कामाधंद्याची सुरूवात करतात. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे ती सतत ऐकावीशी वाटते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहत असल्याने माझ्या कानावर तर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.
(bjp mla atul bhatkhalkar criticises shiv sena azan competition)