देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त ४ तास झोप घेतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढा वेळ तरी काम करावं, असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर भातखळकर यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. (bjp mla atul bhatkhalkar suggest cm uddhav thackeray to work like pm narendra modi)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाबाहेर पडत नसल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे.
कोरोना संकटात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडलं पाहिजे अशी मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांनी सर्वात आधी पंतप्रधानांना याच पद्धतीने संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं, हेच संजय राऊत यांनी यावेळी सुचवलं.
हेही वाचा - “उद्धव ठाकरे सर्वाधिक काळ घरात राहणारे पहिलेच मुख्यमंत्री”
ठाकरे आणि मोदींच्या कामाची पद्धत सारखीच - संजय राऊत
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 3, 2020
कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजीना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा.https://t.co/w92FGc5aouhttps://t.co/mJMRKmflXt
त्यावर कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा, असं म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आव्हान दिलं.
याआधी कोरोना विषाणूचं संकट राज्यात सुरू झाल्यापासून सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकलेला नाही. एका बाजूला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः विविध प्रश्नांवर राज्यात वणवण फिरत आहोत. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील काही ठिकाणी जाऊन आले. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे बरोबर नाही. राज्यभर फिरणं तर सोडाच मुख्यमंत्री मंत्रालयातसुद्धा यायला तयार नाहीत, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.