Advertisement

“मंत्रालयातच झिंग झिंग झिंगाट सुरू असेल तर…”

झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?

“मंत्रालयातच झिंग झिंग झिंगाट सुरू असेल तर…”
SHARES

मंत्रालयातील उपहारगृह परिसरात दारूच्या बाटल्यांचा ढिग आढळून आल्याने सध्या चर्चांना उधाण आलं आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही मंत्रालयात दारूच्या बाटल्या आत कशा आल्या?, त्या कुणी आणल्या यावरून तर्कवितर्क लावले जात आहे. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर मिश्कील टिप्पणी केली आहे. 

आता कळले.. ठाकरे सरकार मधील काही मंत्री..., गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत असतात.. झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार?, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा- मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्याच कशा?, प्रविण दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले प्रश्न घेऊन सामान्य जनता मंत्रालयात येऊ इच्छित असते. मात्र त्यांना प्रवेश पत्र मिळवण्यासाठी तासंतास रांगेत उभं राहावं लागतं. त्यांच्याकडे ओळखपत्र मागितलं जातं. त्यांच्या कामाचं स्वरूप समजावून घेतलं जातं. त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. त्यांच्या बॅगेत सुई किंवा त्यासदृष्य वस्तू असल्यास ती काढली जाते. सर्वसामान्यांच्या बाबतीत एवढी खबरदारी घेतली जात असताना मंत्रालयातील उपहारगृहाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच सापडतो हा प्रकार धक्कादायक आहे.

मंत्रालयात कडक सुरक्षा असताना एवढ्या मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या मंत्रालयात पोहोचल्या कशा?, त्या कोठुन आणण्यात आल्या, कोणी आणल्या तसंच मंत्रालयात मद्य प्राशन कुणी केलं, त्यात कोण कोण सामील होतं? या सर्व बाबींची अत्यंत गांभीर्याने चौकशी होण्याची आवश्यकता आहे. 

त्यामुळे अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या नेतृत्वात गृह, सामान्य प्रशासन विभाग आणि इतर संबंधित विभाग प्रमुखांच्या समितीमार्फत या गंभीर प्रकरणाची १५ दिवसांच्या आत चौकशी करावी, संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी व दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. समितीचा अहवाल, संबंधितांवर करण्यात आलेली कारवाई याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेसाठी खुली करावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा