Advertisement

लाड यांनी ठोकला काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम अशा तिघांवर बुधवारी उच्च न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

लाड यांनी ठोकला काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
SHARES

नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळानजीकच्या भूखंड खरेदी-विक्रीशी काहीही संबंध नसताना फक्त राजकीय हेतूने आपली बदनामी केल्याचं म्हणत भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सूरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम अशा तिघांवर बुधवारी उच्च न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.


काँग्रेसचा आरोप काय?

काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. प्रसाद लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भूखंड खरेदीसाठी बिल्डरला बेकायदेशीरपणे मदत केल्याचा आरोप केला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील २४ एकरचा भूखंड अवघ्या ३ कोटी ६० लाख रुपयांत लाड यांच्या निकटवर्तीय बिल्डरला दिल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. तसंच हा भूखंड सध्याच्या बाजारभावानुसार १६०० कोटींचा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला होता.


गंभीर आरोप

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केवळ वातावरण निर्मितीसाठी काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं सांगत लाड म्हणाले की, आरोपाला कोणताही आधार किंवा पुरावे नसताना केवळ खोट्या माहितीच्या आधारावर माझ्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसने गंभीर आरोप केले. एखाद्या व्यावसायिकाने मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही.


प्रतिमेला धक्का देण्यासाठी

माझी अनेक नेत्यांशी आणि व्यावसायिकांशी मैत्री आहे, याचा अर्थ मी त्यांच्या व्यवसायात भागीदार आहे असा होत नाही, तरीही आरोपांबाबत कोणतीही खातरजमा न करता निव्व्ळ मानसिक त्रास देण्याच्या हेतूने, माझी सामाजिक पत घसरवून माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. या शिवाय माझ्यावरील आरोपाच्या माध्यमातून सरकारच्या प्रतिमेला धक्का देण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा लागत असल्याचंही लाड म्हणाले.


नोटीस बजावणार

काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावण्यात येणार असून ही नोटीस मिळाल्यापासून ३ दिवसांच्या आत त्यांनी त्याबाबतचा खुलासा करावा किंवा २ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्ये आणि आरोप बिनशर्त मागे घेऊन माझी तसंच राज्य सरकारची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावं, असं खुलं आव्हान लाड यांनी काँग्रेसला दिलं आहे.



हेही वाचा-

हिंमत असेल तर शासकीय वसाहतीतील रहिवाशांना बाहेर काढून दाखवाच– राज ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा