मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचं आहे. सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न जबाबदारीने सोडवावा, असं म्हणत भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यावर येत्या १५ ते २५ मार्च दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे.
सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? त्यामुळे मला सरकारला विचारायचं आहे की सरकारकडे याबाबत काही ठोस नियोजन आहे की नाही? १०२ व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत सविस्तर संवाद व्हायला हवा आणि सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
हेही वाचा- “सर्व राज्ये मराठा आरक्षणाला समर्थन देतील अशी दाट शक्यता”
मराठा आरक्षण प्रश्नी १०२ व्या घटना दुरुस्ती सह राजकीय पक्षांनी तुझं माझं करण्यापेक्षा जबाबदारी ने प्रश्न सोडवावा याविषयी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे मांडले.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 12, 2021
https://t.co/XOJTJihGzT
मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. २००७ पासून मी या प्रश्नावर महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर २०१७ ला देखील मुंबईत महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावं लागलं होतं. मात्र मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकतं म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावं लागलं होतं, अशी आठवण देखील संभाजीराजे यांनी करून दिली.
दरम्यान भाजप खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील काही दिवसांपूर्वी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. एकतर आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, नाहीतर विष पिऊन मरु द्या, असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला होता.
(bjp mla sambhaji chhatrapati ask clear stand from maharashtra government on maratha reservation)