येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी आणखीच गुंतागुंतीचा होत चालला आहे. ही डोकेदुखी वाढवली आहे, ती राष्ट्रवादी-काँग्रेसमधून आलेल्या आयारामांनी. तसंच भाजपाच्या मित्रपक्षांनी. आयारामांच्या जोरावर भाजपाने १६० जागांवर दावा ठोकला असून शिवसेनेला ११० जागांची आॅफिर दिल्याचं समजत आहे. शिवाय १८ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचाही भाजपाचा आग्रह कायम आहे. यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर भलेही दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली असली, तरी त्यावर अजूनही एकमत झालेलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला भाजपाकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर शिवसेनेकडून सुभाष देसाई उपस्थित होते. तसंच मित्रपक्षातील नेते आणि आमदारही उपस्थित होते. या बैठकीत भाजपाने १६० जागांवर दावा ठोकल्याचं समजत आहे. भाजपाच्या या दाव्याने शिवसेनेत नाराजी पसरल्याचीही चर्चा आहे.
याआधी दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० फाॅर्म्युल्यावर चर्चा झाली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद वाढल्याचं स्पष्टपणे दिसून आल्याने भाजपा नेते या फाॅर्म्युल्यावर नाराज होते. त्यानंतर झालेल्या भाजपाच्या मेळाव्या काही नेत्यांनी स्पष्टपणे १३५ हून जास्त जागांवर भाजपाने लढावं, अशी मागणी केली. तर काहींनी स्वबळावर लढण्याचा नाराही दिला. भाजपाच्या या नाऱ्याने दुखावलेल्या शिवसेनेला अखेर जागा वाटपाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह घेतील, असं म्हणावं लागलं.
मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपात उडी घेतल्याने भाजपाची ताकद वाढली आहे. परंतु या नेत्यांना तिकीट देण्याचं मोठं आव्हानही भाजपापुढं ठाकलं आहे. अशा स्थितीत १३५-१३५ च्या फाॅर्म्युल्यावर राजी झाल्यास आयारामांना तिकीट देणं कठीणं होऊ शकतं. त्यासाठी भाजपाला कमीत कमी १५० जागांची तरी गरज आहे. शिवाय १८ जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार असल्याने भाजपाने १६० जागा मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचा ठरवलं आहे.
हेही वाचा-
विधानसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा १२५-१२५ फॉर्म्युला
साहेबांवर बोट दाखवणारे डबल ढोलकी- राेहीत पवार