Advertisement

दाऊदच्या फोनमुळे मलिकांचा राजीनामा घेतला नाही - चंद्रकांत पाटील

मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं (bjp) आज आझाद मैदानात भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे.

दाऊदच्या फोनमुळे मलिकांचा राजीनामा घेतला नाही - चंद्रकांत पाटील
SHARES

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. दाऊदनं फोन केला म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं (bjp) आज आझाद मैदानात भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकार मलिकांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाहीत. दाऊदनं फोन केला म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

या सभागृहात राजीनाम्याची घोषणा केली पाहिजे. एक मंत्री कारागृहात आहेत. तरीही मंत्रीपदावर आहेत. हे काही योग्य नाही. त्यामुळे मलिक यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी काढली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

महाराष्ट्र घोटाळामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मलिक यांना कोणी वाचवू शकत नाही. ठाकरे आणि पवार त्यांना उल्लू बनवत आहेत. टेरर फंडिंग, आतंकवाद्यांकडून जमीन घेतली, हा माणूस मंत्रिमंडळात राहूच शकत नाही. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे. जे उद्धव ठाकरेंचे डर्टी डझन आहेत, त्या सर्व डर्टी डझनवर कारवाई होणारच, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं.

जनतेच्या मनात रोष आहे. जो माणूस दाऊदबरोबर व्यवहार करतो तो मंत्रिमंडळात बसूच कसा शकतो? हसीना पारकरसोबत बैठका करतो त्याला मंत्रिमंडळात स्थानच कसं मिळतं? स्वत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अल कायदा आणि जैश-ए-मोहम्मदच्या लोकांशी साटेलोटे आहे असा मंत्री मंत्रिमंडळात कसा राहतो? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.



हेही वाचा

'त्या' ४ ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिस करणार चौकशी - संजय राऊत

IT छापेमारीवर आदित्य म्हणाले, “महाराष्ट्र झुकणार नाही”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा