देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची किमया साधण्यात यश मिळवल्याचं पुढं येत आहे. भाजपाकडून मिळालेली राज्यसभेची ऑफर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्वीकारल्याची माहिती मिळत असून ते सोमवारी राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता आहे.
राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या नारायण राणे यांचं मनपरिवर्तन करण्यात फडणवीसांना यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात भाजपाला सेनेचा रोषही पत्करावा लागणार नाही.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करुन 'एनडीएत' सहभागी झाले. मात्र त्यावेळी राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे यांना भाजपाने राज्यसभेचं गाजर दाखवलं. त्यानुसार राणे यांनी राज्यसभेची ऑफर विचारपूर्वक स्वीकारल्याची माहिती आहे.
अधिवेशनादरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपला निर्णय कळवळा होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय गुलदस्त्यात ठेवून यासंदर्भात अमित शाह यांच्याशी बोलून लवकरच कळवू असं सांगितलं होतं. दरम्यान, शनिवारी राणे काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनाला सांगलीला जाणार असल्याने सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी असणाऱ्या तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा होत आहे. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. मात्र अधिवेशनात अनेक वेळा त्याने आपल्याच पक्षाच्या आमदारांना घरचा आहेर दिला आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरून धारेवर धरलं आहे.
सभागृहात भाजप आमदारांना आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याकडून होणारे आरोप भाजपा आमदारांना जड होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर लवकरच त्यांचं पक्षात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे. यामुळेच त्यांचा विचार राज्यसभेसाठी होत असल्याचं कळत आहे.
हेही वाचा-
विधानभवनात राणे, मुख्यमंत्री भेट
मंत्रीपद नव्हे, तर खासदारकीची आॅफर, दिल्लीवारीनंतर राणेंचा दावा