Advertisement

BMC निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता

नगरविकास विभागाने सोमवारी त्यात सुधारणा करत प्रभाग रचनेच्या कालमर्यादेत वाढ केली आहे.

BMC निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता
SHARES

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार, राज्य सरकारने प्रभाग रचनेचे वेळापत्रकही जाहीर केले होते. मात्र, नगरविकास विभागाने सोमवारी त्यात सुधारणा करत प्रभाग रचनेच्या कालमर्यादेत वाढ केली आहे.

नगरविकास विभागाच्या नव्या आदेशानुसार, 6 ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगरपालिका, 13 ऑक्टोबरपर्यंत ड वर्गाच्या महापालिका आणि 30 सप्टेंबरपर्यंत नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचे अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मे 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले.

आदेशात पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह अन्य महापालिका तसेच नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका दिवाळीच्या मुहूर्तावर होतील, अशी चर्चा होती. मात्र, राज्याच्या नगरविकास विभागाने सोमवारी सुधारित आदेश जारी केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

याआधी सर्व महापालिका, नगर परिषदा यांना प्रभाग रचना सादर करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंतची होती. मात्र, सुधारित कालमर्यादेत प्रभाग रचना सादर करण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडणार असल्याने त्या सादर केल्यानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकांची घोषणा करेल. सुधारित कालमर्यादेमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असे संकेत मिळत आहेत.



हेही वाचा

"पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हेच पहिलीपासून शिकवणार"

गिरगावला होणारा नियोजित मराठी रंगभूमी संग्रहालय प्रकल्प रद्द?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा