महानगर पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या १३८८ चतुर्थ श्रेणी पदांसाठीच्या परीक्षेवरून सध्या चांगलाच गोंधळ सुरू झाला आहे. या परीक्षेच्या काठिण्य पातळीवरून वाद सुरू असून ही परीक्षाच रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी केली आहे. तसे निवेदन त्यांनी मंगळवारी विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना दिले.
दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या या परीक्षेत विचारलेले प्रश्न ऐकून अनेकजण चक्रावून गेले होते. या प्रकरणी भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्नपत्रिकांचे संच दाखवले. 'हे प्रश्न पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि हसायला लागले. यापैकी काही प्रश्नांची उत्तरे मलाही येत नाहीत', असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे भाई गिरकर यांनी सांगितले.
० भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण?
० 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते?
० फुलांमध्ये अथवा वनस्पतींमध्ये दुस-या फुलांमधील किंवा वनस्पतींमधील पराग कणांच्या होणा-या परागसिंचनास काय म्हणतात?
० गायनेशियम म्हणजे काय?
आता भाई गिरकर यांनी दिलेल्या या निवेदनावर आता मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस काय पावलं उचलतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महानगर पालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप यासंदर्भातले कोणतेही लेखी किंवा तोंडी निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेले नाहीत.
हेही वाचा
मुंबई महापालिका कामगार भरतीची परीक्षा पुन्हा होणार?