समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २० डिसेंबरला होणार आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं वानखेडेंना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. नवाब मलिकांना वक्तव्य करण्यापासून रोखण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
आपल्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं सांगत ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना करताना मुंबई उच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं.
यासोबतच न्यायालयानं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सल्ला दिला की, “कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी माहितीची पडताळणी केली पाहिजे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मलिक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण पडताळणीनंतरच पोस्ट करावी.”
न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “सत्यमेव जयते, अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार”.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, जात प्रमाणपत्रातील तफावत असे अनेक आरोप केले आहेत. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्याने अनेक वेळा हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा