विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. यात आता शिवसेनेच्या नेत्यांनीही सूर मिसळला आहे. शिवसेनेनेही शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे असे मत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांसाठी दोन दिवस अधिवेशन आणखी घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका दाखवून भाजपा गट नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.
कर्जमुक्ती करणे, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे, तूर संदर्भातला विषय आणि अवकाळी पाऊस आणि गारपीट या विषयांवर विशेष अधिवेशन बोलवावे या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.