केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई)च्या फेरपरीक्षेच्या फेऱ्यातून अखेर मुंबईतील दहावीच्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे. मुंबईत दहावीची फेरपरीक्षा न घेण्याच्या सीबीएसईच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विद्यार्थी आणि पालकांमधील हाच आनंद रविवारी दादर, शिवाजी पार्क येथील कृष्णकुंजवर दिसून आला.
पालकांनो, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवू नका, बोर्डाची चूक असताना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'सीबीएसई'ला फेर परीक्षा न घेण्याचं आवाहन केलं होतं. राज विद्यार्थी आणि पालकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी रविवारी थेट कृष्णकुंजवर धाव घेत राज ठाकरे यांचे आभार मानले.
सीबीएसईचा दहावीचा गणिताचा, तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला होता. या पेपरफुटीनंतर सीबीएसई बोर्डाने फेरपरीक्षांची घोषणा केली आणि विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढल्या. फेरपरीक्षांवर विद्यार्थी आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत होता. अशातच राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांची फेरपरीक्षांना बसवू नका असं आवाहन सीबीएसईला केलं होतं.
दरम्यान सीबीएसई बोर्डानं बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर २५ एप्रिलला घेण्याचं जाहीर केलं असून सर्व राज्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे मुंबईतील बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यावीच लागणार आहे.
त्याचवेळी मुंबईसह राज्यातील सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सीबीएसई बोर्डानं केवळ दिल्ली आणि हरियाणा, जिथे पेपर फुटले त्याच राज्यात फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांची चिंता दूर झाली आहे.
हेही वाचा-
सीबीएसईचे पेपर लीक करणारा एबीव्हीपीचा नेता, १२ जणांना झाली अटक
दहावीचा पेपर व्हाॅट्सअॅपवर, तिघांना अटक