सध्या राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा असतानाच राज्याच्या प्रशासनातही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच प्रशासनात फेरबदल करण्याचे ठरवल्याची माहिती मिळत आहे.
युती सरकारच्या 3 वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी जलद गतीने पूर्ण व्हावी, यासाठी अहंकारी नोकरशहांना बाजूला करण्यात येणार आहे, तर अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपा सत्तेत आल्यानंतर महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्या केल्या होत्या. या महत्त्वाच्या खात्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना त्या पदांवर तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, पण काही सनदी अधिकारी सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात कुचराई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
तीन वर्षांत नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यामुळे त्यात मुख्यमंत्री व्यस्त होते. मात्र तीन वर्षांतील सरकारच्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी आढावा घेतला आहे. काही खात्यांच्या सचिवांचे काम चांगले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पगडा असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अनेक महत्त्वाची खाती दिली होती, पण या अधिकाऱ्यांवरही मुख्यमंत्र्यांची नजर आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा