आपला देश संविधानावर चालतो आणि आपल्या देशाचं संविधान समानतेवर आधारित आहे. त्यामुळे राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर मतदान करताना शिवसेना संविधान डोळ्यापुढं ठेवून मतदान करेल, अशी अपेक्षा असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं.
महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर मतदान करताना शिवसेना या विधेयकाच्या विरोधात मतदान करेल, असं म्हटलं जात होतं. परंतु राष्ट्रीय हिताचा हवाला देत शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. त्यावरून काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
हेही वाचा- शिवसेनेने राज्यसभेत भूमिका कशी बदलली? अमित शहांचा टोला
त्यानंतर खुलासा करताना शिवसेनेने जोपर्यंत या विधेयकात स्पष्टता येणार नाही, तोपर्यंत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेपुढं मंजुरीसाठी ठेवण्यात आलं आहे. शिवसेना मतदानाच्या वेळी सभात्याग करून बाहेर पडेल, असंही म्हटलं जात आहे. शिवसेनेची ही भूमिकाही भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याने, शिवसेनेने या विधेयकाच्या विरोधात मतदान करावं, असं काँग्रेसला वाटत आहे.