भारताच्या भूमीवर कोणीही घुसखोरी केलेली नाही, असं धक्कादायक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मोदींनी केलेल्या या वक्तव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर (congress leader prithviraj chavan slams pm narendra modi over india china clash and galwan valley comment) परिणाम झाला असून पुढील वाटाघाटीत आणि चर्चेत त्याचा फटका भारताला बसू शकतो. चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मोदींचे चांगले संबंध असल्याचं सर्वांना ठाऊक आहे. त्यांना न दुखावण्याचा त्यामागे काही विचार होता का? असा प्रश्न उपस्थित करत या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाल्याचं समजत आहे, असा टोला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहिद झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना आपल्या वीर जवानांनी धडा शिकवला. डेप्लॉयमेंट, कारवाई आणि प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी जे करायला हवं ते आपलं सैन्य करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितलं होतं.
हेही वाचा - प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात १० हजार रोख जमा करा- पृथ्वीराज चव्हाण
भारताच्या जमिनीवर खुसखोरी झालेली नाही, या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात ते म्हणाले, चीनची घुसखोरी आम्हाला बिलकूल मान्य नाही. घुसखोरी रोखणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात कॉंग्रेस पक्षाचा सरकारला पाठिंबा असेल. पण पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत असून वाटाघाटी करताना याचा प्रभाव पडणार आहे. अशा प्रकारची वक्तव्य करून पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कटकारस्थानाला बळ देऊ नये, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
त्यामागचं कारण म्हणजे आम्ही भारताच्या भूमीत घुसखोरी केली नाही, असं भारताचे पंतप्रधानच सांगत असल्याचं चीन जगाला भासवत आहे. चीनने भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं असून पंतप्रधान मोदी या वक्तव्याबद्दल चीनमध्येही लोकप्रिय होत असल्याचं समजत आहे. पण मुळात पंतप्रधान मोदी यांनी असं वक्तव्य का केलं? याचं योग्य स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही. त्यामागे काही धोरण होतं का? चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत मोदींचे चांगले संबंध असल्याचं सर्वांना ठाऊक आहे. आतापर्यंत त्यांच्यात १९ बैठका झाल्या आहेत. त्यांना न दुखावण्याचा हेतू त्यामागे होता का? पण मोदींच्या वक्तव्यामुळे भारताच्या वाटाघाटी करण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे याचं उत्तर मिळालं पाहिजे, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडलं.
शिवाय गलवान खोरं, पँगाँग परिसरात चीननं मोठा फौजफाटा तैनात केला असून तिथं लष्करी छावणी आणि इतर बांधकामं केल्याचं सॅटेलाईट फोटोंमधून उघड झालं आहे. त्यामुळे मोदींचा दावा आपोआप खोडला गेला आहे. प्रश्न उपस्थित करणं विरोधकांचं काम असून या प्रश्नांना उत्तरं देणं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
हेही वाचा - विमान प्रवाशांचे पैसे परत करा, पृथ्वीराज चव्हाण यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र