मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणारी अभिनेत्री कंगना राणौतला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या जितक्या तातडीने भेट दिली, त्यामागे राज्यपालांवर कुणाचा दबाव होता का? असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. (congress leader raises questions on maharashtra governor bhagat singh koshyari and actress kangana ranaut meeting)
मुंबईत असंख्य अनधिकृत बांधकामे असताना मुंबई महापालिकेने कंगना रणौतच्याच बेकायदा बांधकामावर कारवाई कशी केली? त्याची बाजू महापालिकेकडून न्यायालयात मांडली जात असताना राज्यातील असंख्य लोकांवर अत्याचार होतात, तेव्हा कंगनाप्रमाणेच राज्यपाल प्रत्येकाला तातडीने भेटतात का? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला. तोच धागा पकडून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सचिन सावंत म्हणतात, महामहीम राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसंच ते संविधानाच्या दृष्टिने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख राज्यपालांची असते.
हेही वाचा - कंगनावर दंडात्मक कारवाई करा, बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
Our Honorable Governor Bhagatsingh Koshyari ji may be from Uttarakhand, but currently he is our own from Maharashtra. Constitutionally, he is the head of state of Maharashtra. By constitution, it is constitutional responsibility of governor to safeguard divinity of the post of CM
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2020
म्हणूनच मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना रणौतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो. महामहीमांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. असो!
जरी महामहीमांनी तीला भेट दिली तरी ज्या त्वरेने अजोय मेहतांना बोलावणं धाडलं तशीच तिची कान उघाडणी केली असती, तरी महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता. पण महामहीम आसनस्थ होण्याआधी बसून तिने आमच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
दरम्यान कंगनाने महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून भरपाई म्हणून २ कोटी रुपयांची मागणी देखील केली आहे. त्याला उत्तर देताना महापालिकेने कंगनाकडूनच दंड वसूल करण्यात यावा, अशी बाजू मांडली आहे.
हेही वाचा- ड्रग्स प्रकरणात पोलिसांना नाव सांग, उर्मिलाचं कंगनाला खुलं आव्हान