''बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी २९ नोव्हेंबरला नारायण राणे यांचा न्यायालयात निकाल आहे. त्यावेळी राणे पितापुत्र असे तिघेही तुरुंगात जातील'', असं वक्तव्य गृहराज्य मंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं होतं. केसरकर यांच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात थेट अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
दीपक केसरकर सातत्याने राणे कुटुंबीयांची बदनामी करत असतात. कधी सांगतात ३ नोव्हेंबरला, तर कधी २९ नोव्हेंबरला न्यायालयात राणेंविरोधात मोठा निकाल येणार, असं बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या केसरकर यांच्याविरोधात आम्ही अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. आता केसरकरांना जे काय उत्तर द्यायचं आहे, ते थेट न्यायालयाला द्यावं, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.
राणे यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचालनालय व्यवस्थित तपास करत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर २९ नोव्हेंबर म्हणजेच विधानपरिषद पोट निवडणुकीच्या आधी सुनावणी होणार आहे. तसेच मागच्यावेळी महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील २ नेते तुरुंगात गेले होते आता तीन जण जातील, असा टोला केसरकर यांनी राणेंना लगावला होता.