एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील पीडित कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विखे पाटील यांनी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेऊन त्यांना या पत्राची एक प्रत दिली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे.
आपल्या निवेदनात विरोधी पक्षनेत्यांनी नमूद केले आहे की, या घटनेतील पीडितांना महाराष्ट्र सरकार व रेल्वे विभागाने आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु, या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेले अनेक प्रवासी त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ एकरकमी आर्थिक मदत देऊन ही कुटुंबे पुन्हा उभी राहू शकत नाही.
त्यामुळे या घटनेमध्ये मृत्यमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सर्वच प्रवाशांच्या कुटुंबांचे तातडीने सर्वेक्षण करून, ज्या कुटुंबांचा आर्थिक आधार संपुष्टात आला आहे किंवा प्रभावीत झाला आहे, त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रेल्वे विभागात कायमस्वरूपी नोकरी देण्याची आवश्यकता असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -
कळव्यातील राष्ट्रवादीच्या रेल रोको आंदोलनाचा पचका
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)