राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशात अडवण्यात आलं होतं. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आहे, त्यात भाजप इतका दांभिक कसा? असा प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. (congress spokesperson sachin sawant criticised bjp leader chandrakant patil)
आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत लिहितात की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षांत अर्धा काळ प्रचारमंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते. आणि त्याच वेळेस देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटाबंदीच्या संकटात टाकून १२५ लोकं लाईनमध्ये मेल्यानंतरही विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लाॅकडाऊनची घोषणा पुढे ढकलून देशाला कोरोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता, आश्चर्य आहे.
गेल्या ६ वर्षात दलितांवरील हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला, आश्चर्य आहे.
हेही वाचा - राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यू.पी. पोलिसांच्या ताब्यात
.@ChDadaPatil दादा,
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 21, 2020
भारतीय जनता पक्ष इतका दांभिक कसा?
आश्चर्य आहे! https://t.co/u0xwqDBPI4 pic.twitter.com/1FYTz0FrXL
ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला, त्यावेळेला महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनी आणि पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून दिल्याने संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी जाब विचारला तेव्हा त्यांना अरेरावी करून गप्प बसवणाऱ्यांनी आता उपदेश द्यावा हे आश्चर्य आहे.
देश कोरोनाच्या संकटात जात असतानाही बिहारमध्ये प्रचार करणाऱ्या भाजपने इतरांना उपदेश द्यावा, आश्चर्य आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
याआधी चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर टीका केली होती. राज्याचे ऊर्जामंत्री उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. तुम्हा सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल की राज्यात जिथे जनता वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहेत, लोकं आत्महत्या करत आहेत. मात्र ऊर्जामंत्री तिथं उत्तर प्रदेशात कसे? हे तेच ऊर्जामंत्री आहेत, जे म्हणाले होते की बिल वाढले नाही, केवळ लोकांना तसं वाटत आहे. त्यांनी एकदा तरी नागपूरच्या त्या कुटुंबाचे दु:ख दिसले का? ज्या कुटुंबातील एका व्यक्तीने वीज बिल जास्त आल्याने आत्महत्या केली होती, असा प्रश्न नितीन राऊत यांना विचारला होता.