कुठलीही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडणार असाल, तर पुढचे काही दिवस मास्क (Face mask compulsory) लावलंच पाहिजे, त्यात काहीही गैर नाही, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जनतेला केल्या. सोशल मीडियावरून संवाद साधताना त्यांनी या महत्त्वाच्या सूचना केल्या.
घरातही मास्क लावा
कोरोनाचा संसर्ग (coronavirus) वाढत असताना आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री अंतर राखून बसले होते, प्रत्येकाने चेहऱ्याला मास्क लावलं होतं. हे सोशल डिस्टंसिंग (social distancing) आम्ही पाळतो, तुम्हीही पाळा. व्हिडिओ काॅन्फरन्सिगने झालेली कदाचीत अशी पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असेल. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जातांना गर्दी करू नका तसंच मास्क लावूनच घराबाहेर पडा किंवा शक्य असेल तर घरातही मास्क लावा. मास्क लावण्यात काहीही गैर नाही. मी तर असं म्हणेन की हे संकट दूर गेल्यानंतरसुद्धा पुढचे काही दिवस प्रत्येकाने मास्क घातलंच पाहिजे.
हेही वाचा - मुंबईत मास्कविना बाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार
घरगुती मास्क बनवा
मास्क दुकानातलंच असलं पाहिजे, असं काही नाही. घरगुती स्वरूपात तयार केलेलं साध्या कापडाचं मास्क देखील चालेल. दोन-तीन घड्या केलेला कापडाचा तुकडाही त्यासाठी चालेल. पण पावसाळ्यातल्या छत्रीसारखं एकाचं मास्क घराबाहेर पडताना दुसऱ्याने वापरु नका. वापरलेला साधा कपड्याचा मास्क गरम पाण्यात धुवून कडक वाळवून पुन्हा वापरता येईल. रेडिमेड मास्क वापरणाऱ्यांनी या मास्कची विल्हेवाट काळजीपूर्वक लावावी, सुरक्षित जागा पाहून हे मास्क जाळावेत व त्याची राख सुरक्षितपणेच फेकावी, म्हणजे विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जर जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. मला तर असे वाटते की यातून बाहेर पडल्यानंतर पुढचे काही दिवस आपल्याला मास्क वापरला पाहिजे आपल्या सुरक्षेसाठी.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2020
तंदुरुस्ती हवी
कोरोनाच्या संकटानंतर एक नवीन आर्थिक संकट उभं राहणार आहे, या संकटाशी सामना करण्यासाठी, या युद्धाला सामोरे जाण्यासाठी तंदुरुस्तीची आणि हिंमतीची आवश्यकता आपल्या सगळ्यांना पडणार आहे. त्यामुळे घरातच हलके फुलके व्यायाम करा, ज्यांना शक्य आहे आणि जमेल त्यांनी योगा करा, घरातील वातावरण आनंदी ठेवा. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार इ. गंभीर आजार असणाऱ्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवावं. वृत्तवाहिन्यांनीही घरातील वातावरण तणावमुक्त ठेवण्यासाठी बातम्यांप्रमाणेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावेत, जुने कार्यक्रम दाखवावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
ग्राफ शून्यावर आणायचा
जगभरातील परिस्थितीचे गांभीर्य विशद करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याकडे रुग्ण सापडून ४ आठवडे पूर्ण झाले. लॉकडाऊनने गैरसोय होतेय खरं आहे, पण सोशल डिस्टंसिंगसारखे दुसरे हत्यार आज आपल्याकडे नाही. एवढे करूनही संख्या वाढत आहे. परंतू आपल्याला ही वाढच नको आहे, रुग्णाचा वाढता आलेख आपल्याला शून्यावर आणायचा आहे. त्यामुळे आपले घर हेच आपले गडकिल्ले आहेत, आपणच आपले संरक्षक आहोत हे लक्षात ठेऊन प्रत्येकाने वागायचे आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा- राज्य सरकार सुरू करणार फिव्हर क्लिनिक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे