मुंबईतील कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या हलगर्जीपणाबद्दल महापालिका प्रशासनावर टीका केली जात असताना याच पद्धतीने अर्धा डझन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मृतदेह सापडला
कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर मालाड परिसरात राहणाऱ्या या ८० वर्षांच्या गृहस्थांना ३ दिवसांपूर्वी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु सोमवार पहाटेपासून ते बेपत्ता होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह बोरिवली स्थानकाबाहेर सापडला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईंकांनी केला आहे.
या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले हे शताब्दी रुग्णालयाला भेट देणार आहेत. या घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं अमेय घोले यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा - शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू
Last few days, half dozen dead bodies of COVID patient's were GAYAB ( disappeared/misplaced) from BMC Hospitals. I wrote to Maharashtra Home & Health Ministers for Actions @mybmc @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @MumbaiPolice pic.twitter.com/haPQWKwUrX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 9, 2020
यावर भाष्य करताना किरीट सोमय्या यांनी महापालिका रुग्णालयांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सोमय्या यांच्या मते मागील काही दिवसांमध्ये याच पद्धतीने महापालिकेच्या विविध रुग्णालयातून अर्धा डझन कोरोनाबाधिक रुग्णांचे मृतदेह हरवले/ गायब झाले आहेत.
अर्धा डझन रुग्ण
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात की, गेल्या काही दिवसांत मुंबईतून कोरोनाग्रस्त अर्धा डझन मृतदेह रुग्णालयातून गायब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पत्रात त्यांनी गायब कोरोनाबाधित रुग्णांची नावं आणि केईएम रुग्णालय- परळ, राजावाडी रुग्णालय-घाटकोपर, शताब्दी रुग्णालय- कांदिवली, नायर रुग्णालय- वरळी, सायन रुग्णालय- शीव आणि ट्राॅमा केअर रुग्णालय- जोगेश्वरी या रुग्णालयांचा उल्लेख केला आहे. मृतदेह गायब होणाऱ्या कुटुंबाच्या मन:स्थितीचा विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती देखील किरीट सोमय्या यांनी पत्रातून केली आहे.
हेही वाचा - वांद्र्यातील गर्दी हा पूर्वनियोजीत कट, किरीट सोमय्यांचा दावा