महाराष्ट्रातील जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (food and supply minister chhagan bhujbal) यांनी दिली. लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील (maharashtra) गरजूंना दिला जात आहे.
योजना गरिबांसाठी
एप्रिल ते जून असे ३ महिने प्रती लाभार्थी दर महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची ही योजना आहे. पात्र रेशन कार्डधारक (ration card holder) कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ ३ एप्रिलपासून टप्याटप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ०८२ मेट्रीक टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतलं जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून देण्यात येईल.
हेही वाचा - राज्य सरकार सुरू करणार फिव्हर क्लिनिक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वितरण सुरळीत सुरु
याचप्रमाणे कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन (lockdown) काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, म्हणून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे (Food grains supply) वितरण सुरळीत सुरु असून १ ते ७ एप्रिल २०२० या ७ दिवसांत राज्यातील ९० लाख ०२ हजार ८६८ रेशन कार्डधारकांना २२ लाख ८३ हजार १८० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. तसंच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
#CoronaInMaharashtra लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई सुरू- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री @ChhaganCBhujbal pic.twitter.com/Swk31aNIMh
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 8, 2020
दोन्ही योजनांचा लाभ
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४५२ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.
तर, केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु. किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु. किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.
हेही वाचा- प्रतिबंधित भागात महापालिका पोहोचवणार धान्य
राज्यात या योजनेमधून सुमारे १२ लाख ५२ हजार ३५० क्विंटल गहू, ९ लाख ७५ हजार १४४ क्विंटल तांदूळ, तर ११ हजार ५०३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आलं आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख २३ हजार ७१५ स्थलांतरित रेशन कार्डधारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.