महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) राज्यातील जवळपास ५ लाख मजुरांच्या जेवणाची आणि निवासाची व्यवस्था केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी शनिवारी दिली. लाॅकडाऊन झाल्यामुळे हाती काम नसल्याने हे सर्व परप्रांतीय मजूर (migrent labour) आपल्या मूळ गावी, राज्याबाहेर जाण्यास निघाले होते. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका होता. त्यामुळे या मजुरांना आहे त्या ठिकाणीच थोपवून धरण्यात आलं.
तसंच २१ दिवसांच्या या लाॅकडाऊन दरम्यान १४ एप्रिलपर्यंत या मजुरांच्या जेवणाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येक विभागाला ४५ कोटी रुपयांचा निधी देखील वितरीत करण्यात आला आहे.
लढ्यासाठी एकत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी सोशल मीडियावरून साधलेल्या संवादात सर्वात पहिल्यांदा कोरोनाच्या लढ्यात उतरलेले सर्व शासकीय कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे आभार मानले. सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन करोनाशी लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. अनेक कंपन्यांनी आपापली हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी उघडून दिली आहेत, काही जणांनी हॉस्पिटल्स दिली आहेत. काही संस्था पुढे येऊन जेवणाचं वाटप करत आहेत. काही जणं पैसे देत आहेत. सिंहाचा नाही तर खारीचा वाटा सगळेजण उचलत आहेत, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
Maharashtra has around 5 lakh migrant labour whose meals, breakfast, medical facilities, have been provided for. Care is being taken of women and children. pic.twitter.com/jtWeoHngA1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 4, 2020
इकडे तिकडे जाऊ नका
आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ५ लाखांच्या आसपास मजूर आहेत, त्यांच्या २ वेळेच्या जेवण, १ वेळचा नाश्ता, डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आपण देत आहेत, या सगळ्या सुविधा आपण केलेल्या आहेत. महाराष्ट्रात जे इतर राज्यातील लोकं आहेत, मजूर आहेत, तुम्ही ज्या कॅम्पमध्ये आहात त्याच कॅम्पमध्ये रहा, इकडे तिकडे जाऊ नका, तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र सरकार पूर्ण क्षमतेने तुमची काळजी घेत आहे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना केलं.
वृ्द्धांची काळजी घ्या
ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ४९०-५०० च्या आसपास पॉझिटीव्ह रुग्ण आपल्याकडे सापडले आहेत, त्यापैकी ५१ जण आता बरे होऊन घरी गेले आहेत, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. आधी रुग्ण आपल्याजवळ येत होते. आता प्रशासन घरोघरी जाऊन रुग्ण शोधत आहेत. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये बहुतेकजण वृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, हुदयरोग इ. असाध्य रोग असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपल्या घरातील वृद्धांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा- मुंबईतील लाॅकडाऊन उठण्याची शक्यता कमीच! अन्यथा सर्व उपाययोजना फेल
आपला महाराष्ट्र शुरांचा, वीरांचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे. इकडे धैर्याला, शिस्तीला, जिद्दीला कोणी कमी नाही आणि लढायला तर आम्ही मागेपुढे बघतच नाही. लढणार आणि जिंकणार, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.