महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याच सोबतच लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लान काय आहे? असा प्रश्न देखील सरकारला केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. एक ना एक दिवस लाॅकडाऊन काढावंच लागणार आहे. पण लाॅकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर काय? राज्यातील लॉकडाऊन सरकार कशा पद्धतीने उठवणार आहे, हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेलं नाही. सरकारने याबाबत जनतेला किमान १० ते १५ दिवस आधी सांगायला हवं. आयत्या वेळी सांगणं बरोबर नाही.
हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे
येत्या २५ तारखेला ईद आहे. याकाळात लॉकडाऊन नसला तर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतील, त्यामुळे कोरोना रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रमजानचा महिना असल्याने अनेक लोकं घराबाहेर पडत आहेत. हे योग्य नाही. सर्वधर्मिय आपले सण घरात साजरे करत असताना मुस्लिम समाजानेही तसा विचार करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
● शैक्षणिक वर्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे तेव्हा शाळा कशा आणि कधी सुरु होणार? ह्यांची स्पष्टता सरकारतर्फे येणं आवश्यक आहे जेणेकरून पालकांची चिंता कमी होईल.
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 7, 2020
पोलिसांवरील ताण कमी करा
लाॅकडाऊनमुळे मागच्या दीड महिन्यापासून ड्युटीवर तैनात पोलीस आता थकलेले आहेत. अतिरिक्त कामामुळे ते देखील तणावाखाली आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काहीजण पोलिसांना अगदीच गृहीत धरायला लागलेत. अशा ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची नेमणूक करावी. जेणेकरून त्या भागात दरारा निर्माण होऊन लोकं घाराबाहेर येणार नाहीत. पण याचा अर्थ पोलीस कमी पडले असं नाही, तर यामुळे त्यांच्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल. कंटेंटमेंट झोन तसंच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवायला हवा, अशी सूचनाही त्यांनी केली.
सुरक्षेचा विचार
मुंबईतील छोटे दवाखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. सरकारी कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांनाही कोरोनाची लागण होणं ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या सुरक्षेचाही प्राधान्यक्रमाने विचार करायला हवा, असंही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - हीच 'ती' योग्य वेळ, परप्रांतीयांबद्दल राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना