Advertisement

किती ढोंग करशील संजू बाबा? मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदेंचा राऊतांना टोला

राज ठाकरेंनी केलेल्या मागणीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख केवळ उथळ नाही, तर त्यांची कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा आहे, असं म्हणत मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

किती ढोंग करशील संजू बाबा? मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदेंचा राऊतांना टोला
SHARES

राज्यात वाईन शाॅप आणि हाॅटेल सुरू करण्याची परवानगी द्या, अशी राज्य सरकारला सूचना करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. परंतु राज ठाकरेंनी केलेल्या मागणीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख केवळ उथळ नाही, तर त्यांची कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा आहे, असं म्हणत मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्याची आर्थव्यवस्था ढासळली आहे, हे लक्षात घेऊन महसुलाचा उत्तम स्त्रोत मानला जाणार मद्यविक्री आणि हाॅटेल व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. 

हेही वाचा - वाईन शाॅप, हाॅटेल्स सुरू करा, राज ठाकरेंचा सरकारला सल्ला

या मागणीचा सामनाच्या अग्रलेखातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. ‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए…’ असे नेहमीच म्हटले जाते, पण सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठय़ा वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱया जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत, असं संजय राऊत यांनी लिहिलेल्या अग्रलेखात म्हटलं आहे.

त्याला मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून राऊतांना टोला हाणताना शिंदे म्हणाले, राज्याचा महसूल हा एक गंभीर प्रश्न आहे. याबाबत राजसाहेबांनी केलेल्या मागणीवर सामनाचे का संपादक संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख केवळ उथळ नाही, तर त्यांची कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा आहे. विचारांचा आणि वास्तवाचा 'सामना' शिवसेना कधी करणार?

जगात जी दारू प्यायली जाते, त्यातील २० टक्क्यांहून अधिक दारू एकट्या भारतात रिचवली जाते. राज्यांच्या महसुलाचा सर्वाधिक हिस्सा दारू करांतून येतो. स्पष्ट सांगायचं तर, देशातील राज्ये, त्यात महाराष्ट्र आलंच, दारूच्या महसुलावर सर्वाधिक अवलंबून आहेत! सामनाच्या संजूबाबाला हे माहीत नाही. 

हेही वाचा - राज ठाकरेंचा सल्ला केंद्राने ऐकला? गृह मंत्रालयाने दिली ‘ही’ दुकानं उघडायला परवानगी

किती ढोंग करशील संजू बाबा? तळीरामांचे टेन्शन जाणार ही बातमी पान १वर छापता आणि राजसाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणारा अग्रलेख लिहिता!? सत्याचा 'सामना' कधी करणार, संजू बाबा?, असे प्रश्नही कीर्तीकुमार शिंदे यांनी राऊतांना विचारले आहेत. 

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा