कोरोनाशी (coronavirus) दोन हात करण्यासाठी राज्य सरकार सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहे. त्याला फक्त नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सध्या राज्यात रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) यांनी केलं आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केलं.
हेही वाचा - Coronavirus Updates: तर, नाईलाजाने कारवाई करावीच लागेल- राजेश टोपे
सध्या आपल्या राज्यात १० ते १५ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा (blood donation) आहे. आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. मात्र आपल्या परिने रक्तदान सुरु ठेवा. रक्तदान केल्याने करोनाचा (COVID-19) कोणताही धोका नाही. मात्र रक्तदान करताना इतर कोणताही संसर्ग होणार नाही याचीही काळजी घ्या. रक्तदान करताना फार गर्दी करु नका, सामाजिक अंतर ठेवून रक्तदान करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई येथील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली.राज्यातील जनतेने या मंडळाचे अनुकरण करून रक्ताचा झालेला तुटवडा भरून काढण्याचे काम करावे ही विनंती. pic.twitter.com/ztVBeZsh2V
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 23, 2020
मधुमेही, दमा, रक्तदाबाचा आजार असलेले रुग्ण, लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सद्यस्थितीत कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी राज्यात ६ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केल्यानुसार येत्या २७ मार्चपासून राज्यातील प्रत्येक मेडिकल कॉलेजात लॅब सेटअप करण्यात येणार आहे. तसंच खासगी रुग्णालयातही कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी देण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद
दरम्यान, राजेश टोपे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट देऊन त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. तसंच इतर मंडळांनीही त्यांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं.