Advertisement

वांद्र्यातील गर्दीवर चर्चेची गुऱ्हाळं, मग, सूरतच्या उद्रेकाचं काय? शिवसेनेचा सवाल

काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुऱ्हाळे चालवली गेली. या गुऱ्हाळांमध्ये सुरत इथं परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? हे मोठं षड्यंत्र आहे.

वांद्र्यातील गर्दीवर चर्चेची गुऱ्हाळं, मग, सूरतच्या उद्रेकाचं काय? शिवसेनेचा सवाल
SHARES

काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुऱ्हाळे चालवली गेली. या गुऱ्हाळांमध्ये सुरत इथं परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? हे मोठं षड्यंत्र आहे. त्यामागचे गौडबंगाल लोकांना समजलं. पण आम्ही या षड्यंत्राचा मुखवटा ओढून काढू, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात वांद्र्यातील गर्दीवरून सरकारला टीकेचं लक्ष्य करणाऱ्यांना खडे बोल सुनावण्यात आले आहेत.

नेमकं काय म्हटलंय सामनात?

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी अचानक हजारो परप्रांतीय मजूर जमले आणि त्यांनी धिंगाणा घातला. आपापल्या राज्यांत जाण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि लगेच ही गर्दी उसळली. गाड्या सोडण्याबाबत ‘अफवा’ पसरली असं आम्ही सांगत नाही. ती बातमीच आहे. कारण अशा गाड्या सोडण्याबाबतचं रेल्वेचं एक परिपत्रकच समोर आलं आहे. म्हणजे अफवा उठली आणि लोकांनी गर्दी केली असं म्हणता येत नाही. दुसरं असं की, १५ एप्रिलनंतरच्या तारखांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन कसं घेतलं? पंतप्रधान ‘लॉक डाऊन’ उठवणार की आणखी काही करणार याबाबत संभ्रम असताना रेल्वे ४० लाख लोकांचं रिझर्व्हेशन घेऊन गोंधळ उडवते हा अपराध आहे. त्यामुळे वांद्रय़ात जी गर्दी उसळली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यास रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे व त्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत काय? 

हेही वाचा- कोरोना मृत्यू रोखणं मोठं आव्हान, मुख्यमंत्र्यांची खासगी हाॅस्पिटल्सच्या सीईओंशी चर्चा 

मुंबईत, नवी मुंबईत आणि मुंब्रा परिसरात कोण्या दीडशहाण्याने ‘चलो अपने घर’यासारखं एक विषारी अभियान राबवलं व त्या जाळय़ात हे परप्रांतीय मजूर अडकले. या दीडशहाण्यास आता पोलिसांनी अटक केली आहे. जे मुंबईतील वांद्रय़ात घडले तोच प्रकार मोदी-शहांच्या सुरतमध्ये घडला. तेथील हिऱ्याच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो परप्रांतीय मजुरांनादेखील त्यांच्या घरी जायचं आहे. ‘लॉक डाऊन’मुळे त्यांचे खाण्यापिण्याचे वांधे झाले. सरकारी मदतीचे बुडबुडेही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. हे सत्य असेल तर भविष्यातील वणव्याची ही ठिणगी पडली आहे, असं आम्ही समजतो. 

लोक आपापल्या गावी जाण्यासाठीच जमले होते ना? मग त्यांच्या हाती साधी वळकटीही कशी नसावी? पुन्हा मुंबईतून परराज्यांमध्ये जाणाऱया गाड्या फक्त वांद्र्यावरूनच सुटत नाहीत. त्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे, नागपुरातूनही सुटतात; पण गर्दी जमा केली गेली ती फक्त वांद्रे स्थानकाजवळ. काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुऱ्हाळे चालवली गेली. या गुऱ्हाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? हे मोठं षड्यंत्र आहे.

अशा शब्दांत शिवसेनेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा- आठवड्याभरात मिळेल घरपोच पोषण आहार- यशोमती ठाकूर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा