राज्यावरील कोरोना व्हायरसच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला संपवणं, ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन तसंच औद्योगिक व सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनामुळे रुळावरून घसरलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याची मोठी जबाबदारी या समितीवर असणार आहे.
७ मंत्रिमंडळ सदस्य
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक स्वराज संस्था, शासनाच्या विविध यंत्रणां युद्धस्तरावर काम करत आहेत. त्यांच्या लढाईल बळ देण्याचं कामही ही समिती करणार आहे.
हेही वाचा- कोरोना लढ्यासाठी मुंबईतील ९ नामवंत डाॅक्टरांची टास्क फोर्स
राज्यावरील #coronavirus संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन #कोरोना ला संपवणं, ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन, औद्योगिक व सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमिती स्थापन. pic.twitter.com/gGSfD5F43Z
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 14, 2020
अर्थव्यवस्थेच्या पुनरूज्जीवनासाठी समिती
राज्यात २४ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू असल्याने राज्यातील उद्योगधंदे इतर व्यवसाय जागीच थांबले आहेत. उत्पादन, खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा मोठा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्यासाठी ११ तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करणार आहे.
यांचा समावेश
या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरही ही मंत्रिमंडळसमिती निर्णय घेईल. या समितीत जे. एस. सहानी (सेवानिवृत्त आयएएस), सुबोधकुमार (सेवानिवृत्त आयएएस), रमानाथ झा (सेवानिवृत्त आयएएस), उमेशचंद्र सरंगी (सेवानिवृत्त आयएएस), जयंत कावळे (सेवानिवृत्त आयएएस), सुधीर श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयएएस), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
हेही वाचा- मुंबईत 'ड्राइव्ह इन टेस्ट'ला सुरूवात, गाडीतच बसूनच होणार कोरोनाची चाचणी