संपूर्ण देशभरात घोंघावत असलेलं कोरोनाचं संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र सरकारने घोषित करावं, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत (sanjay raut) यांनी ही मागणी केली.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं सांगितलं आहे. याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोनाचं संकट राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता तरी केंद्राने तशी घोषणा करावी आणि त्याअंतर्गत देशातील सर्वच राज्यांसाठी मदतीची तरतूद करावी, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा- कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
Supreme Court has said that it (COVID-19 pandemic) is a national calamity. Maharashtra CM Uddhav Thackeray has been continuously requesting the Central government to declare COVID-19 as a national calamity: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/C9H0kPsqEw
— ANI (@ANI) April 29, 2021
महाराष्ट्रातील स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्र सरकार सर्वात चांगलं काम करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचं सरकार इतर राज्यांच्या तुलनेत चांगलं काम करत आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न कसोशीने सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे.
या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र अनेकांनी केलं. मात्र ते त्यात अयशस्वी ठरले. परंतु काही दिवसांनी दिल्लीला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावं लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारला हाणला.
दरम्यान काही दिवसांपूर्वी कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी तसंच राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याची सोय करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहून केली होती.
(declare covid 19 pandemic as a national calamity demands shiv sena mp sanjay raut)