केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केलेले असून ते सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहेत. तरीही या सर्व प्रकरणावर मौन बाळगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापोटी अनिल देशमुखांचा राजीनामा घेत नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आपल्याच पक्षाचे धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख यांचा शरद पवार यांनी बचाव केला. मात्र, शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
हेही वाचा- पोलीस बदल्यांच्या रॅकेटवर मुख्यमंत्र्यांचं पांघरूण, फडणवीसांचा गंभीर आरोप
केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री @OfficeofUT हे आता @PawarSpeaks यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. #ResignanilDeshmukh pic.twitter.com/mKH8n77P1B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
बदल्यांच्या रॅकेटवर कारवाई का नाही?
तर दुसरीकडे, पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटसंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवण्यात आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांनी ताबडतोब कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. परंतु २५ ऑगस्ट २०२० पासून आत्तापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, उलट हे गृहमंत्र्यांकडेच का पाठवलं. मुख्यमंत्र्यांनीच या सगळ्यावर पांघरुण घातलंय, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे.
तसंच पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा ६.३ जीबी इतका डेटा माझ्या हातात लागलेला आहे. त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
(devendra fadnavis criticized uddhav thackeray and sharad pawar over maharashtra police transfer issue)