महाराष्ट्राकडे असलेले केंद्र सरकारचे ४० हजार कोटी परत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते असा दावा करून कर्नाटकमधील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, हेगडे यांचा हा दावा फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. हे सगळं धादांत खोटं आहे. महाराष्ट्रानं एकही पैसा केंद्राला परत केलेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
#WATCH Former Maharashtra CM & BJP leader Devendra Fadnavis on Ananth K Hegde (BJP) remark, 'Devendra Fadnavis became CM & in 15 hours he moved Rs 40,000 crores back to Centre': No such major policy decision has been taken by me as CM. All such allegations are false. pic.twitter.com/wSEDOMGF4N
— ANI (@ANI) 2 December 2019
फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सहकार्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार स्थापनेचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर साडेतीन दिवसातच फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला होता. साडेतीन दिवसांच्या या मुख्यमंत्रिपदाचं रहस्य खासदार अनंतकुमार हेगडे यांनी नुकतंच उघड केलं. महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेले केंद्राचे ४० हजार कोटी परत करण्यासाठीच फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले होते, असा दावा त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. हेगडे काय म्हणाले मला माहीत नसून मला मीडियातूनच ही माहिती मिळाली. यामध्ये काहीही तथ्य नाही. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मी शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयाशिवाय कोणताही निर्णय घेतलेला नाही. बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक कंपनी सुरू करण्यात आली असून प्रकल्पासाठी निधी आलाच तर तो संबंधित कंपनीकडं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.