केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास शुक्रवार १ मे २०२० रोजी परवानगी दिली. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी निवडणुका होतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
न्यायालयात धाव
महाराष्ट्रात घटनात्मक पेच होऊ नये म्हणून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून दोनदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करण्यात आली होती. परंतु राज्यपालांनी या प्रस्तावावर सही करण्यास असमर्थता दाखवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. याचिकाकर्ते सुरींदर मोहन आरोरा यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली.
हेही वाचा - ३ मे नंतर लाॅकडाऊन वाढणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले...
Elections to the Legislative Council (MLCs) in Maharashtra will be conducted on May 21 in Mumbai: Election Commission of India (ECI) https://t.co/fWQZXcNola
— ANI (@ANI) May 1, 2020
पत्राद्वारे विनंती
त्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोरोनाबाबतची काळजी घेऊन विधान परिषद निवडणूक घेण्याची मागणी करणारं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असं पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवलं. याच पत्राचा आधार घेत राज्यपालांनी निवडणुका घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली.
सोशल डिस्टन्सिंग पाळून
या मागण्यांची दखल घेत अखेर निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ९ रिक्त जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत निवडणूक घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना २८ मे च्या आत आमदार होणं शक्य होणार आहे. शिवाय त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देखील कायम राहणार आहे.
हेही वाचा - झुंबड कराल, तर राज्याबाहेर जाण्याची परवानगी रद्द- उद्धव ठाकरे