कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला देशव्यापी लाॅकडाऊन ४ मे रोजी संपल्यानंतर परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्याची केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार सगळ्यांसाठी व्यवस्था करण्यात येईल. परंतु जर का यात झुंबड झाली, तर सर्व परवानगी काढून घेतली जाईल, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं कडक पालन करण्याचे निर्देश दिले.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/AjHM5lSdt1
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 1, 2020
हेही वाचा- ३ मे नंतर लाॅकडाऊन वाढणार? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले...
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, परराज्यात जे जाऊ इच्छितात, त्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण शिस्तीने. लगेच झुंबड केली, तर ती सुद्धा काढली जाईल. कारण हे खूप धोकादायक आहे. आपल्याला परराज्यांशी बोलून तिथं जाणाऱ्या लोकांची आधी व्यवस्था करावी लागेल, त्यानंतरच लोकं पाठवता येतील. सहाजिकच इतर राज्यांत जी आपली लोकं आहेत, त्यांनाही आपल्याकडे आणावं लागेल. दोन राज्ये परस्पर सहकार्याने वाहतूक व्यवस्था करतील, त्यानंतरच लोकांचं आदानप्रदान केलं जाईल. लोकांना गावं, वस्तीनुसार सोडण्याची व्यवस्था केली जाईल.
जिल्ह्यात अडकलेल्यांसाठी
आपल्या राज्यातल्या राज्यात जी लोकं गावी गेली होती, काही लोकं पर्यटनाला गेली होती, काही लोकं कामासाठी गेली होती, पण लाॅकडाऊन सुरू झाल्याने अडकली. त्यांनासुद्धा लगेच इकडेतिकडे न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्राधान्यक्रम ठरवून आणण्या-नेण्याची व्यवस्था केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्याबाहेर जाणाऱ्या किंवा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तींमध्ये कोरोनासंदर्भातील काहीही लक्षणे आढळल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलंही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेलं असणं आवश्यक असेल.
हेही वाचा- दिलासा! कन्टेंटमेंट झोनमधून 331 ठिकाणं वगळली
प्रवाशांची संपूर्ण यादी
ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमतीपत्रे असणं आवश्यक असेल. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झिट पास, त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणं गरजेचं. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधीही बंधनकारक. पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत, तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार.