मुलुंड - भाजपाच्या विजयावर आक्षेप घेत उर्वरित सर्व पक्षांनी मंगळवारी मुलुंड रेल्वे स्थानक ते टी वॉर्ड कार्यालय असा मोर्चा काढला. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि मुलुंडमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश प्राप्त झालं. मुलुंडमधील सहाच्या सहा जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय. त्यामुळे या निवडणुकीत वापरल्या गेलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये भाजपाने घोटाळा करत हा विजय मिळवल्याचा गंभीर आरोप मनसे उमेदवार सुजाता पाठक यांनी केला आहे. तसेच मनसे उमेदवार नमिता जाधव यांनी फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार जगदीश शेट्टी यांनी हा सगळा भाजपाचा डाव असल्याचे सांगितले आहे. या सर्व उमेदवारांनी टी वॉर्डमध्ये फेरनिवडणुक घेण्याचे अर्ज अतिरिक्त आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिले. यासंदर्भात जर दखल घेतली गेली नाही तर मुलुंड बंद करण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीयांकडून देण्यात आला आहे.