Advertisement

जामिया आंदोलन: चेतन भगतने दिला सरकारला इशारा, म्हणाला…

या कारवाई दरम्यान पोलिसांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना पकडून अमानुषपणे मारहाण केल्याचं म्हटलं जात असताना प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने या प्रकरणावरून केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

जामिया आंदोलन: चेतन भगतने दिला सरकारला इशारा, म्हणाला…
SHARES

नागरिकत्व दुरूस्ती कायद्या (CAA) विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी रविवारी जोरदार निदर्शने केली. या निर्दशादरम्यान हिंसाचार उफाळल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना पकडून अमानुषपणे मारहाण केल्याचं म्हटलं जात असताना प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने या प्रकरणावरून केंद्र सरकारला इशारा दिला आहे. 

हेही वाचा- ‘जामिया’च्या हिंसक आंदोलनाचे मुंबईत पडसाद, आयआयटी, टिसच्या विद्यार्थ्यांनी दिला पाठिंबा

या हिंसाचारात ४ बससह काही दुचाकी जाळण्यात आल्या. त्यादरम्यान पोलिसांनी जबरदस्तीने विद्यापीठात घुसखोरी केली. अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करत त्यांना ताब्यात घेतल्याचा पोलिसांवर आरोप होत आहे. यापैकी ५० विद्यार्थ्यांना पोलिसांनी सोमवारी पहाटे सोडलं. पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात असतानाच लेखक चेतन भगत यानेही सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

चेतन भगत तरूणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शिवाय तो भाजपचा समर्थक असल्याचंही मानलं जातं. तरीही त्याने भाजप सरकारला इशारा देताना तरूणांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असं सुनावलं आहे. चेतनने एक ट्विट करत म्हटलं आहे की, देशात ढासळणारी अर्थव्यवस्था. नोकऱ्यांचं कमी होत जाणारं प्रमाण, इंटरनेट बंद करणे, पोलिसांनी वाचनालयात घुसखोरी करणे, तरूणांमध्ये संयम नक्कीच आहे. परंतु त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, अशा शब्दांत सरकारला फटकारलं आहे. 

पोलिसांनी विद्यापीठ परिसरात जबरदस्तीने घुसखोरी करत अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप खुद्द जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही केला आहे. 

हेही वाचा- विद्यार्थी असले म्हणून कायदा घाती घेऊ शकत नाही, सरन्यायाधीशांनी सुनावलं

माझ्या राजकीय भूमिकेसंदर्भात अनेकजण संभ्रमात पडले आहेत. पण मला इतकंच सांगायचं आहे की, ज्या भारतात सगळेजण एकोप्याने राहतात, त्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम असावी, असं मला वाटतं. मी कधीही गटबाजीत रमत नाही. मी एखाद्या गटापेक्षा भारताच्या बाजूने असल्याचा मला अभिमान आहे, असं म्हणत चेतन भगतने आपल्या ट्विटवर खुलासा केला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा